#Lockdown | महाराष्ट्रात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढणार
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. या बैठकीत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन वाढवायचा, काढायचा की प्रत्येक राज्यावर त्याचा निर्णय सोपवायचा याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. राज्यातील कोरोनाचा कहर पाहता, महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अनुकूल असल्याची माहिती समोर येत आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलपर्यंत आहे. मात्र अद्यापही भारतात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने तो पुढे वाढवला जाण्याचे संकेत आहेत. मात्र लॉकडाऊन कायम राहणार, की संपणार, त्याची घोषणा कधी होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.