#CoronaVirus: तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार
दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची अजिबात गरज नव्हती असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी वारंवार टीव्हीवर यासंबंधी बातम्या दाखवून सांप्रदायिक कलह वाढेल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे असंही म्हटलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं योग्य पालन करा असं आवाहन केलं.
शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “सध्याच्या घडीला देशात ४०६७ करोनाच्या केसेस आहेत. तसंच ११८ मृत्यू झाले आहेत. ३२८ रुग्ण बरे होऊन घऱी गेले आहेत. हे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखं नाही. करोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो ही स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सूचनांचं पालन केलं पाहिजे. ही आजची गरज आहे”.