१८ मार्चला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ‘Yes’ बँकेवरील निर्बंध हटवले जाणार
येत्या बुधवारी म्हणजे १८ मार्चपासून येस बँकेवरील निर्बंध हटवले जाणार असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. १८ मार्चला संध्याकाळी सहा वाजल्यापासून निर्बंध मागे घेतले जाणार आहे. खासगी क्षेत्रातील येस बँकेंच्या पुनर्रचना आराखड्याला गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने या बँकेवर घातलेले निर्बंध उठविण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शक्तिकांत दास यांनी येस बँकेतील खातेदारांचे पैसे संपूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नसल्याचं म्हटलं आहे… तसेच खातेदारांनी या बँकेतील आपले पैसे काढून घेण्याची घाई अजिबात करू नये आणि विनाकारण ताण घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. खातेदारांचे हित लक्षात घेऊनच या बँकेच्या पुनर्रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. २६ मार्चला येस बँकेचे नवे संचालक मंडळ अस्तित्त्वात येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.