सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहरातील विकासाला बसला खोडा, अजित पवारांच्या संवादाची आवश्यकता
– पक्षाबद्दल गैरसमज पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न
– ज्ञानेश्वर कस्पटे यांनी व्यक्त केली अजितदादांपुढे खंत
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नाकर्तेपणामुळे विकासकामे रखडली आहेत. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचा गैरसमज समाजात पसरवला जात आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी शहरात आपल्या उपस्थितीत संवाद कार्यक्रम होण्याची आवश्यकता आहे. तरी आपण यासाठी वेळ काढावा, अशी विनंती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी केली आहे.
यासंदर्भात कस्पटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पिंपर-चिंचवड शहरात राष्ट्रवादीने केलेल्या कामांमुळे अनेक प्रांतातील नागरिक याठिकाणी स्थायीक होऊन नोकरी, व्यवसाय करत आहेत. परंतु, गेल्या गेल्या तीन वर्षांपासून शहरात विकासकामांची अक्षरशः वाट लागली आहे.
स्वार्थी राजकीय नेतेमंडळींमुळे शहरातील विकास रेंगाळला आहे. त्यासाठी आपल्या पक्षाला जबाबदार धरले जात आहे. नागरिकांचा देखील तसा गैरसमज झाला आहे. तरी हा गैरसमज दूर करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांबरोबर आपला मुक्त संवाद होणे गरजेचे आहे.
या चर्चासत्रामध्ये प्रत्येक स्तरातील एक प्रतिनिधीला सामाऊन घ्यावे. पत्रकार, समाजिक कार्यकर्ता, शिक्षक, खेळाडू, लघु उद्योजक व नागरिक यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तरी सदर चर्चासत्रासाठी व नागरी सत्कारासाठी आपण वेळ द्यावा.
आपण वेळ दिला तर पक्षाबद्दल नागरिकांमध्ये असलेला गैरसमज आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे दूर होईल. तरी, चर्चासत्रासाठी आपण वेळ द्यावा अशी विनंती कर्यकर्ते ज्ञानेश्वर संपत कस्पटे यांनी व्यक्त केली आहे.