फडणवीस सरकारची जलयुक्त शिवार योजना रद्द करण्याचा ठाकरे सरकारचा मानस…
मुंबई | महाईन्यूज |
फडणवीस सरकारचे अनेक निर्णय रद्द करणाऱ्या ठाकरे सरकारनं आता गेल्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजनाच गुंडाळण्याचा निर्णय़ घेतला..दुष्काळावर मात करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं या योजनेला मिळणारा निधी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्तांनी याबद्दलचं पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमधील जलयुक्त शिवारची कामं थांबणार आहेत.
जलयुक्त शिवार देवेंद्र फडणवीसांची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना होती. या योजनेतून अनेक जिल्ह्यांना फायदा झाल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. मात्र नव्या सरकारनं ही योजना गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी निधी न देण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे नाशिक, जळगाव, नंदुरबार, नगर, धुळे या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांना ब्रेक लागणार आहे. विभागीय आयुक्तांचे आदेश डावलून जलयुक्त शिवार योजनेसाठी निधी दिल्यास आर्थिक गैरव्यवहार म्हणून कारवाई करण्यात येईल, अशा सूचना विभागीय आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान ठाकरे सरकारच्या या निर्णयाबद्दल भाजपानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे….