महिला बचत गटांनी मुलांच्या खेळणी उत्पादनाकडे वळावे – जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे
- टाटा सामजिक संस्थेत दोन दिवसीय उद्योजक शिबीर संपन्न
तुळजापूर | महाईन्यूज | प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग सुरू आहेत. त्यामुळे त्या अंतर्गत काम करणाऱ्या महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होताना दिसून आले. आता बचत गटांनी चीनच्या धर्तीवर लहान मुलांच्या खेळण्यांचे उत्पादन तयार करून त्यासाठी बचत गट बाजारपेठ निर्माण करावी, असे मत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले.
तुळजापूर येथील टाटा विज्ञान सामाजिक यांच्या माध्यमातून सामाजिक नाविन्यकरण आणि उद्योजकता कोर्स अंतर्गत दोन दिवसीय उद्योगिनी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले. उपक्रमासाठी प्रा. सत्यजित मुजुमदार मुंबई, महात्मा गांधी मिशन विद्यापिठाचे डॉ. सुधीर गव्हाणे, लघुउद्योग भारतीचे संजय देशमाने, एसबीआय संचालक गोविंद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, माविमचे जिल्हा समन्वयक एम. एस. कुलकर्णी, डॉ. रमेश जारे, डॉ. नीलम यादव आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या की, टाटा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गावांत विशेष काम सुरू असते,बचत गट असो किंवा गावातील मूलभूत सोयी सुविधा बाबत सर्व्हे केला जातो, आपल्या जिल्ह्यातील अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू असून त्याचा उपयोग समाजास होतो आहे अन त्यातूनच आर्थिक उन्नती साधली जात आहे.यावेळी बारुळ व बसवंतवाडी येथील काम कौतुकास्पद असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केले. या दोन दिवसीय उपक्रमात पर्यावरण पूरक उद्योजगता,उद्योगासमोरील आर्थिक आव्हाने, ग्रामीण उद्योग जगतातील महिला बचत गटांची भूमिका,शासकीय योजना,व त्यांची माहिती याबाबत सविस्तर मार्गदर्शन चर्चासत्र घेण्यात आले.
या उपक्रमात टाटा सोशल सामाजिक संस्था मुंबई, महात्मा गांधी मिशन यूनिवर्सिटी औरंगाबाद, एनआयसीए अहमदाबाद, आयटीएआरएमआयटी यांचे विशेष योगदान लाभले. या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विशेष सत्रामध्ये देशातील विविध राज्यातून आलेल्या तज्ञव्यक्ती, प्राध्यापक, विद्यार्थी, उद्योजक यांनी उद्योजकता विषयावर शोधनिबंध सादर केले. या शोधनिबंधाच्या माध्यमातून उद्योग जगतातील नाविन्यपूर्ण समाज उपयोगी विषयातील यशोगाथा व आर्थिक गुंतवणुकीबाबत व समस्या विषयक सखोल भाष्य केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रमेश जारे, डॉ. नीलम यादव, प्रा. रूपेश कौशिक व संस्थेतील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन हे शिबीर संपन्न केले.