साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा राखली नाही तर लोक काय भूमिका घेतात, निवडणुकीत दिसले : शरद पवार
मुंबई : साताऱ्याच्या गादीबद्दल सगळ्यांना आदर आहे. या गादीची प्रतिष्ठा राखली नाही तर लोक काय भूमिका घेतात हे या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे, असा टोला शरद पवारांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना लगावला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजेंनी राष्ट्रवादीची साथ सोडत खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे साताऱ्याच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.
‘मान गादीला, मत राष्ट्रवादीला’ अशी घोषणा देत राष्ट्रवादी साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत उतरली होती. राष्ट्रवादीच्या घोषणेला साद देत सातारकरांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या बाजूने कौल दिला. सातारच्या गादीबद्दल सगळ्यांना आदर असून या गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभव सातारकरांनी केला आहे. श्रीनिवास पाटलांना विजयी केल्याबद्दल साताऱ्याला जाऊन तिथल्या जनतेचे आभार मानणार आहे, असे शरद पवारांनी सांगितले.