नामवंतांविरुद्ध ‘एफआयआर’; थरूर यांचे मोदींना निषेधाचे पत्र
तिरुअनंतपूरम : देशातील झुंडबळींच्या वाढत्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या विविध क्षेत्रातील ४९ नामवंतांविरुद्ध एफआयआर नोंदविल्याबद्दल तीव्र निषेध करणारे पत्र काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
पंतप्रधानांवर जे टीका करतात त्यांना देशविरोधी समजले जाऊ नये, असेही थरूर यांनी ७ ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. एखाद्याने आपल्याबद्दल अथवा सरकारबद्दल नापसंती दर्शविली तरी विचारस्वातंत्र्याच्या बांधिलकीचा आपण आदर करतो याबाबत देशाला आश्वस्त करावे आणि टीकेचे स्वागत करावे, असेही थरूर यांनी म्हटले आहे.
देशातील झुंडबळींच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे त्याकडे आपले लक्ष वेधण्यासाठी २३ जुलै २०१९ रोजी ४९ नामवंतांनी आपल्याला पत्र लिहिले त्यांच्याविरुद्ध मुझफ्फरपूर, बिहारमध्ये एफआयआर नोंदविण्यात आले त्याने आम्ही अस्वस्थ झालो आहोत, या एफआयआरविरुद्ध आम्हाला तीव्र निषेध नोंदवायचा आहे, असेही पत्रामध्ये म्हटले आहे.
जातीय तणाव अथवा मुले पळविण्याच्या प्रकारांमधून झुंडबळींचे प्रकार घडणे हा विकार असून त्याचा झपाटय़ाने प्रादुर्भाव होत आहे आणि ही बाब आपल्या निदर्शनास आणून या नामवंतांनी योग्य पाऊल उचलले आहे, असेही पत्रामध्ये म्हटले आहे.