लोकप्रतिनिधीच्या शिफारसी, आयुक्तांकडून कर्मचा-यांच्या मुदतपुर्व बदल्यांचा धडाका
- ‘अर्थपुर्ण’ वाटाघाटीमुळे अधिकारी-कर्मचा-यांच्या होताहेत बदल्या?
- महापालिका बदली धोरणांचे निकष प्रशासनाने ठेवले धाब्यावर
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजप पदाधिका-यांच्या शिफारसी, अधिकारी – कर्मचा-यांच्या वैद्यकीय कारणे आणि विनंती अर्जामुळे बदली धोरणाचे निकष प्रशासनाने धाब्यावर ठेवले आहेत. आयुक्तांनी मुदतपुर्व बदल्यांचा धडाका लावला आहे. अनेक बदल्यांमध्ये अर्थपुर्ण वाटाघाटी होवू लागल्या आहेत. मात्र, पालिकेच्या गरजू कर्मचा-यांना वैद्यकीय कारणास्तव बदली आवश्यक असताना त्या कर्मचा-यांना बदलीसाठी वेटींगला थांबावे लागत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता यावी आणि कार्यालयीन कामकाजाच्या सोयी दृष्टीने वर्ग दोन, तीन आणि चार मधील कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. प्रशासन विभागाने 26 जूलै 2019 मध्ये 29 लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यातील अनेक कर्मचा-यांच्या मुदतपुर्व बदल्या केलेल्या आहेत. त्या कर्मचा-यांच्या आठ महिन्यात अन्यत्र बदली करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक अधिकारी व कर्मचा-यांवर अन्याय होत आहे.
दरम्यान, महापालिकेच्या प्रशासन विभागाकडून बदली धोरण निकष पायदळी तुडविण्यात येत आहे. अनेक अधिकारी व कर्मचा-यांनी वैद्यकीय कारणे देवूनही त्याची बदली होत नाही. त्यांना बदली धोरणाचे निकष लावून वेटींग लिस्टमध्ये ठेवले जात आहे. परंतू, पदाधिका-यांच्या शिफारसी, कर्मचा-यांकडून लक्ष्मीदर्शनाचा लाभ मिळाल्यास सर्वकष निकष धाब्यावर बसून बदल्या करण्यात येवू लागल्या आहेत.
याबाबत प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर म्हणाले की, प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता येण्यास आणि कार्यक्षमपणे पार पाडण्याच्या दृष्टीने ह्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, मुदतपुर्व बदल्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.
महिलांच्या गंभीर तक्रारीकडे आयुक्तांचे दुर्लक्ष
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील तत्कालीन विभाग प्रमुखांच्या स्वीय सहायकांविरोधात तेथील महिलांनी निनावी तक्रार करुन गंभीर आरोप केले होते. निनावी तक्रार केल्याने विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर त्या तक्रारी अर्जावर संबंधित लिपिकांची चाैकशी होवून त्यांच्यावर कारवाई म्हणून लेखा विभागात बदली करण्यात आली. परंतू, संबंधित लिपिकांची मुदतपुर्वच आरोग्य विभागात बदली करण्यात आली. विशेष म्हणजे वैद्यकीय विभागातील महिलांनी केलेल्या गंभीर तक्रारीकडे आयुक्तांनी दुर्लक्ष करुन त्या कर्मचा-यांची बैठक व्यवस्था वैद्यकीय विभागात केली आहे. त्यामुळे महिलांच्या तक्रारीकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.





