300 किलोमीटरचे अंतर कापूनही ‘त्या’मजूर महिलेचा मानवतमध्ये मृत्यू
मानवत | लॉकडाऊनमुळे हाताला कामधंदा न राहिलेल्या महिलेने आई व मामाचे गाव गाठण्यासाठी नगर जिल्ह्यातून मिळेल त्या वाहनाने 300 किलो मीटरचे अंतर कापले. परंतू अवघ्या 40 किलो मीटर अंतरावरच मानवतमध्ये तीचे हे आई भेटीचे स्वप्न अधुरेच राहीले. मंगळवारी (दि.05) सकाळी मानवत मधील के.के.एम. महाविद्यालयासमोर या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. दरम्यान तीच्या या मृत्यू बाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सुनीता कैलास कतार असे या मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. नगर जिल्ह्यात मजूरीचे काम करणारी सुनीता एकटीच तेथे वास्तव्यास होती. तीची बहिण नांदगाव (जि. नाशिक) तालुक्यातील घाटपारा या गावी असल्याने लॉकडाऊनमध्ये हाताला काम न राहिल्याने ती बहिणीकडे काही दिवस राहण्यास गेली. परंतू लॉकडाऊन वाढतच असल्याने तीने नगरमार्गे दैठणा (ता.परभणी) या गावाकडे येण्याचा निर्धार केला. दैठणा येथे तीची आई व मामा वास्तव्यास असल्याने तीने माजलगाव, पाथरी मार्गे मिळेल त्या वाहनाने आपले मार्गक्रमण सुरु केले.
मंगळवारीच ती नगरहून निघाली होती. त्यामुळे तीला एखादे वाहन मिळाले असावे, असा पोलीस सूत्रांचा अंदाज आहे. मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास सुनीताचा मृतदेहच मानवतमधील के.के.एम. महाविद्यालयाच्यासमोर असलेल्या उड्डानपूलाच्या बाजूस आढळून आला. एखाद्या अज्ञात वाहनाने तीला धडक दिली असावी, असा पोलीसांनी अंदाज वर्तवला आहे.