मराठवाड्याच्या दुष्काळावर फडणवीसांचा मोठा दावा; ‘शेतकऱ्यांच्या पाठीशी, तातडीने उपाययोजना सुरू’
उद्धव ठाकरेंच्या ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनावर फडणवीसांचा पलटवार; ‘हे नाकार्त्यांचं आंदोलन, आम्ही करून दाखवलं’

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्यातील पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर भाष्य करत शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे आश्वासन दिले. अधिकृत पंचनामे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (NDRF) निकषांनुसार ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असले, तरी सरकार त्याआधीपासूनच प्राथमिक पाहणी आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजना करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पावसाचा मोठा खंड पडल्याने मराठवाड्यासह राज्यातील इतर भागांतील खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ज्या भागात परिस्थिती गंभीर आहे, तिथे तातडीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना थेट मदत, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था यासह दुष्काळसदृश परिस्थितीतील आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील २० जिल्ह्यांतील ८६ तालुक्यांमध्ये ३० दिवसांपर्यंत पावसाचा खंड पडल्याची माहिती सरकारसमोर आली आहे. त्यामुळे खरीप हंगामावर परिणाम झाला असून, अधिकृत नुकसान पाहणी आणि पंचनाम्यांच्या आधारे पुढील मदत निश्चित केली जाणार आहे.
हेही वाचा – पंतप्रधान आवास योजनेतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा
‘हे नाकार्त्यांचं आंदोलन’
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील प्रश्नांवर सरकारविरोधात ‘तुमसे ना हो पायेगा’ या नावाने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर फडणवीस यांनी टीका केली. ‘हे नाकार्त्यांचं आंदोलन आहे. ज्यांना संधी मिळाली, त्यांनी काही केले नाही,’ अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर निशाणा साधला.
‘आम्ही यापूर्वीही करून दाखवलं आहे आणि पुढेही करून दाखवू,’ असे फडणवीस यांनी सांगितले. मराठवाड्याला दिलेला शब्द पूर्ण करण्याची सरकारची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘फ्लड मिटिगेशनचं पाणी आणण्याचं काम सुरू’
मराठवाड्यातील पाण्याच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्याच्या नियोजनाचा उल्लेख केला. फ्लड मिटिगेशनच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यापूर्वी दिले होते. त्यासाठी डीपीआर तयार करण्यात आला असून, टेंडर काढण्यात आले आहे आणि जागतिक बँकेची मान्यताही मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्याच्या मोठ्या प्रकल्पासाठी डीपीआर तयार असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. छत्रपती संभाजीनगर आणि जालना परिसरात उद्योग, विशेषतः ईव्ही क्षेत्रातील गुंतवणूक वाढल्याचा दावा करत त्यांनी मराठवाड्याच्या विकासाच्या मुद्द्यावरून विरोधकांवरही टीका केली.
फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे एकीकडे पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या शेतकरी संकटावर सरकारच्या तातडीच्या उपाययोजनांचा मुद्दा पुढे आला आहे, तर दुसरीकडे मराठवाड्याच्या विकासावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्षही तीव्र होण्याची शक्यता आहे.





