गणेशोत्सवातही शरद पवार गटाची तातडीची बैठक; दुष्काळासह राज्यातील विविध प्रश्नांवर होणार चर्चा
कोअर कमिटीच्या बैठकीत धोरणात्मक निर्णयांची शक्यता; जरांगे आंदोलनावरून शशिकांत शिंदेंची सरकारवर टीका

मुंबई : राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. शरद पवार स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पक्षाची भविष्यातील वाटचाल, राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच महाराष्ट्र आणि देशातील विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.
दर १५ दिवसांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेतली जाते. त्याचाच भाग म्हणून आजची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत काही धोरणात्मक निर्णयही घेतले जाणार असून, पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत चर्चा होणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीवर प्रामुख्याने चर्चा
राज्यातील दुष्काळी परिस्थिती हा बैठकीतील महत्त्वाचा विषय असेल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. याशिवाय राज्यातील तसेच देशातील विविध प्रश्नांवर पक्षाची भूमिका आणि पुढील दिशा याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
हेही वाचा – मंगलमय वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष
जरांगे आंदोलनावरून सरकारवर टीका
मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारवर टीका केली. जरांगे मुंबईत येणार की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगत, त्यांना मुंबईत येण्याची वेळ येणे हे सरकारचे अपयश असल्याचा दावा त्यांनी केला.
सरकारने सुरुवातीला जरांगे यांच्याशी चर्चा सुरू केली होती. मात्र, त्यानंतर अचानक चर्चा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि प्रतिनिधी न पाठवण्याची भूमिका घेण्यात आली. या निर्णयामागचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे शिंदे यांनी म्हटले.
जरांगे यांच्या आंदोलनावर मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली. आंदोलनामागे राजकीय अजेंडा आहे का, असा प्रश्न काहींनी उपस्थित केल्याचा दावा शिंदे यांनी केला. आंदोलन करणाऱ्यांशी राजकारण बाजूला ठेवून संवाद साधणे ही सरकारची भूमिका असायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
‘आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने नाराजी’
मनोज जरांगे यांच्या भाषेबाबतही शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांशी त्यांच्या शैलीत बोलतात. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली नसल्याची त्यांची भावना असल्याने त्यातून त्यांचा संताप व्यक्त होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाल्याची माहिती प्रभावीपणे पटवून देण्यात सरकार कमी पडले, असा दावा त्यांनी केला. तसेच जरांगे यांच्या आंदोलनावरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.





