TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; “मी त्यांना कधीही भेटलो नाही”

“राजकीय हेतूने गेल्या सहा वर्षांपासून नाव जोडण्याचा प्रयत्न”; CBI चौकशी निष्पक्षपणे होऊ द्यावी, आदित्य ठाकरेंचे आवाहन

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या नव्या CBI तपासाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे. “मी दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती,” असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. गेल्या सहा वर्षांपासून राजकीय हेतूने आणि वैयक्तिक द्वेषातून या प्रकरणाशी आपले नाव जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, कोणताही पुरावा किंवा संबंध नसतानाही आपले नाव या घटनेशी जोडले जात आहे. माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चांमुळे सत्य बदलणार नाही, असे म्हणत त्यांनी अधिकृत यंत्रणांना कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि पूर्वग्रहाशिवाय तपास करू देण्याचे आवाहन केले.

“अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करू द्या,” अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.

हेही वाचा –  अण्णासाहेब मगर स्टेडियममधील जलतरण तलावाच्या दुरुस्तीला गती!

काय आहे दिशा सालियन प्रकरण?

दिशा सालियन या अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या माजी मॅनेजर होत्या. ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी पोलिसांनी Accidental Death Report (ADR) नोंदवली होती आणि पुढील चौकशीनंतर मृत्यू आत्महत्या असल्याचे म्हटले होते. सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू त्यानंतर १४ जून २०२० रोजी झाला.

दरम्यान, दिशा यांचे वडील सतीश सालियन यांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनी या प्रकरणात बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप करत CBI चौकशीची मागणी केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना बॉम्बे हायकोर्टाने २ सप्टेंबर २०२६ रोजी CBIला FIR नोंदवून तपास करण्याचे निर्देश दिले.

यानंतर CBIने FIR नोंदवून या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला. FIRमध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, दिनो मोरिया, सूरज पांचोली, रोहन रॉय तसेच काही माजी पोलिस अधिकारी आणि इतर व्यक्तींची नावे तपासाच्या संदर्भात नमूद आहेत. तपासात कटकारस्थान, पुरावे दडपणे किंवा नष्ट करणे आणि पुराव्यांमध्ये फेरफार केल्याच्या आरोपांचाही समावेश आहे.

मात्र, CBI FIRमध्ये कोणालाही आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. FIRमध्ये नाव किंवा भूमिका तपासासाठी नमूद असणे हे संबंधित व्यक्ती दोषी असल्याचे सिद्ध करत नाही. CBI तपासातून या आरोपांबाबत तथ्य समोर येणे अपेक्षित आहे.

आदित्य ठाकरे यांनीही चौकशीला सामोरे जाण्याची भूमिका घेत, तपास यंत्रणांना स्वतंत्रपणे चौकशी करू देण्याचे आवाहन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button