“भारतीय कंपन्यांनी जगाचे नेतृत्व का करू नये?”; विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींचा मोठा सल्ला
“ग्लोबल कन्सल्टन्सी, अकाऊंटिंग, लीगल आणि फायनान्स कंपन्या उभारण्याची क्षमता भारतीयांमध्ये”; SRCCच्या शताब्दी सोहळ्यात विकसित भारताचे व्हिजन मांडले

नवी दिल्ली : “आज भारतीय जगातील टॉप कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत, याचा आपल्याला अभिमान आहे. मग भारताची ग्लोबल कन्सल्टन्सी फर्म का बनू शकत नाही? भारतीयांची अकाऊंटिंग, लीगल आणि फायनान्स फर्म ग्लोबल लीडर का बनू शकत नाही?” असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
नवी दिल्लीतील **श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC)**च्या शताब्दी सोहळ्यात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारताचे व्हिजन मांडले. भारतीयांनी उभारलेल्या कंपन्यांनी जगाचे नेतृत्व का करू नये, असा सवाल करत हे लक्ष्य साध्य करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय तरुणांकडे ज्ञान आणि नेटवर्कची कमतरता नाही. देशात आता नव्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक इकोसिस्टम तयार झाली आहे. त्यामुळे मोठी लक्ष्ये निश्चित करून ती साध्य करण्याची वेळ आली आहे, असे मोदी म्हणाले.
“पूर्ण ग्लास भरलेला आहे, ही आशावादी दृष्टी”
देशाच्या विकासाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरही पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले. “अर्धा ग्लास भरलेला आहे” असे अनेकजण म्हणतात. मात्र, पूर्वीच्या सरकारांच्या काळात अर्धा ग्लास रिकामा असल्याचे सांगणारी निराशावादी मानसिकता होती, असे ते म्हणाले.
“मी तर म्हणतो की पूर्ण ग्लास भरलेला आहे. अर्धा पाण्याने आणि अर्धा हवेने भरलेला आहे,” असे सांगत मोदी यांनी विद्यार्थ्यांनी सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले.
हेही वाचा – जरांगे पाटीलांच्या उपोषणाचा आठवा दिवस; सरकारच्या हालचालींना वेग
दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित केला. २००८ मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तत्कालीन सरकारने पाकिस्तानला जाब विचारला नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, केंद्रात त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर पाकिस्तानला अशा प्रकारचे धाडस करण्यापूर्वी विचार करावा लागतो, असे मोदी म्हणाले.
दहशतवाद पसरवणारे घटक आज बॅकफूटवर आले असून, पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केल्यास भारतीय सशस्त्र दल त्याला प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरपासून ईशान्य भारतापर्यंत शांततेचे वातावरण निर्माण झाले असून हिंसाचारात मोठी घट झाली असल्याचा दावाही मोदी यांनी केला. तसेच माओवादी दहशतवाद आणि नक्षलवादाविरोधातील लढ्यात सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाला मोठे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
“धोरणात्मक पंगुत्वातून धोरणात्मक गतिशीलतेकडे”
“एकेकाळी जो देश धोरणात्मक पंगुत्वामुळे चिंतेत होता, तोच भारत आज आपल्या धोरणात्मक गतिशीलतेमुळे जगभरात चर्चेत आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली असून देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारकडून आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.





