विदर्भात पावसाचा जोर वाढणार; गोंदिया आणि अमरावतीला ‘ऑरेंज अलर्ट’

नागपूर | ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेल्या मोठ्या उघडिपीमुळे आणि वाढत्या तुटीमुळे संकटात सापडलेल्या विदर्भातील बळीराजाला काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व विदर्भात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर आज, ३ सप्टेंबर रोजी गोंदिया आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने तिथे ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, बुलढाणा, अकोला, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा
गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन
गंगीय पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा लगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. याशिवाय मध्य प्रदेश परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि दक्षिण गुजरातपासून तयार झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे पूर्व विदर्भात पावसासाठी अतिशय पोषक वातावरण तयार झाले आहे.
विदर्भात पावसाची २२ टक्के तूट
यंदा १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण विदर्भात तब्बल २२ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. काही विशिष्ट जिल्ह्यांत तर ही तूट ३० ते ४० टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती नागपूर हवामान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिली. सप्टेंबरमध्येही विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने, पुढील दोन-तीन दिवसांत पडणारा हा पाऊस सुकणाऱ्या खरीप पिकांसाठी संजीवनी ठरणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





