मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक; 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
130 गावांतील मराठा सेवकांची अंतरवाली सराटीत बैठक; आंदोलनाची रूपरेषा ठरणार, मुंबईतही आंदोलनाचे संकेत

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज गोदा पट्ट्यातील मराठा सेवकांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला सुमारे 130 गावांतील मराठा सेवक उपस्थित आहेत.
29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी आणि पुढील दिशा या बैठकीत निश्चित केली जाणार आहे. लाखोंच्या संख्येने मराठा समाज अंतरवाली सराटीत दाखल होणार असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
58 लाख कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र, सातारा, औंध, पुणे, कोल्हापूर आणि बॉम्बे गॅझेटसह मराठा आरक्षणाशी संबंधित सर्व मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागण्या पूर्ण केल्याशिवाय सरकारला एक मिनिटाचीही मुदत देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
हेही वाचा – साखरेचे दर वाढले; सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला
मुंबईत आंदोलनाची शक्यता; आझाद मैदानाची पाहणी
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या समन्वयकांनी आझाद मैदानाची पाहणी केली. त्यामुळे आगामी आंदोलन अंतरवाली सराटीपुरते मर्यादित राहणार की मुंबईतही आंदोलन केले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारसमोर पुन्हा मोठे आव्हान
29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीकडे विशेष लक्ष आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील रणनीती आणि सरकारसमोर मांडण्यात येणाऱ्या मागण्यांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.





