महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
IMD कडून अनेक राज्यांना पावसाचा इशारा; २१ ऑगस्टपर्यंत काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यासह देशातील अनेक भागांत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील ४८ तासांत हवामानात महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस कोकण आणि गोव्यात अनेक भागांत पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे घाट परिसरातील नागरिकांनी तसेच प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीचा परिणाम पूर्व भारतातील अनेक राज्यांवर होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातील काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो.
हेही वाचा – ‘दिमागी नक्षलवादी’ कोण? किरेन रिजिजूंकडून यादी स्पष्ट; काँग्रेसला प्रत्युत्तर
बिहार, छत्तीसगड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अंदमान-निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, बिहार, छत्तीसगड, ईशान्य भारत आणि उत्तराखंडमध्येही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशातील अनेक भागांत २१ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहू शकतो. पूर्व भारत, उत्तर प्रदेश, ईशान्य भारत आणि हिमालयीन प्रदेशातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तामिळनाडूच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत १९ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पावसाचा जोर वाढल्याने सखल भागांत पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि काही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनासह नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.





