पिंपरी-चिंचवडकरांचा सवाल : डोके ठिकाणावर आहे का?… आमदार रोहित पवार यांचा भंपकपणा चव्हाट्यावर!
आत्महत्याग्रस्त महिलेच्या मृत्यूचेही राजकारण करण्याची विकृत मानसिकता : कौटुंबिक वादाला राजकीय रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या गणेश गावकवाड यांच्या पत्नी सोनाली गावकवाड यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. मात्र, या संवेदनशील घटनेचे दुःख बाजूला ठेवून तिच्या मृत्यूला थेट राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो अधिक संतापजनक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे हाच प्रश्न उपस्थित झाला आहे—डोके ठिकाणावर आहे का?
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये सोनाली गावकवाड यांच्या आत्महत्येमागे मोशी दुर्घटनेतील नुकसानभरपाई, कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती आणि संबंधित प्रशासनाच्या भूमिकेचा संदर्भ दिला आहे. मात्र, कौटुंबिक वादातून घडलेल्या आत्महत्येची संपूर्ण वस्तुस्थिती अधिकृत तपासातून स्पष्ट होण्याआधीच त्याला राजकीय व्यवस्थेच्या अपयशाशी जोडणे कितपत योग्य?, हा सवाल आता उपस्थित होत आहे.
एखाद्या महिलेने आत्महत्या केली, तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, अशा वेळी प्रथम गरज असते ती संवेदनशीलतेची. तपास यंत्रणांनी घटनेची कारणमीमांसा करावी, दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा—यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. मात्र, मृत्यूच्या घटनेला आपल्या राजकीय कथानकासाठी वापरणे हा संवेदनशीलतेचा नव्हे, तर राजकीय संधीसाधूपणाचा प्रकार आहे.
रोहीत पवार यांची राजकीय उद्देशाने केलेली पोस्ट पहा..
मोशी कचरा दुर्घटनेत मृत्यू झालेले कामगार नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचं वृत्त मन सुन्न करणारं आहे. कचऱ्याचा डोंगर कोसळल्यामुळं गायकवाड कुटुंबावर आधीच दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि आता तर याच कुटुंबातील दुसरा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 13, 2026
मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना मदत, नुकसानभरपाई आणि पुनर्वसन याबाबत प्रशासनाने विविध निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता घडलेल्या प्रत्येक वैयक्तिक कौटुंबिक घटनेचा थेट संबंध मोशी दुर्घटनेशी जोडण्यापूर्वी वस्तुस्थिती, तपासाचे निष्कर्ष आणि संबंधित कुटुंबीयांची अधिकृत बाजू समोर येणे गरजेचे आहे.
कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य वैयक्तिक कारणातून घडलेल्या घटनेला राजकीय षडयंत्राचा किंवा प्रशासनाच्या अपयशाचा मुलामा देणे हा मृत व्यक्तीच्या दुःखाचा सन्मान आहे का? असा सवाल पिंपरी-चिंचवडकरांमधून उपस्थित होत आहे.
लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवावा, प्रशासनाला जाब विचारावा, दोषींवर कारवाईसाठी पाठपुरावा करावा, यात दुमत नाही. पण एका दुःखद आत्महत्येच्या घटनेचे राजकीय भांडवल करण्याऐवजी त्या कुटुंबाला न्याय आणि आधार मिळवून देणे अधिक महत्त्वाचे नाही का?
कै. सोनाली गायकवाड यांचे वडील काय म्हणतात ऐका…
सोनाली गावकवाड यांच्या मृत्यूचे खरे कारण तपासातून समोर यावे आणि दोषी कोणीही असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी, हीच अपेक्षा. मात्र, तपास पूर्ण होण्याआधीच निष्कर्ष काढून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू करणे म्हणजे दुःखद घटनेवर राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न, अशी टीका आता होत आहे.
कै. सोनाली गायकवाड यांच्या आई काय म्हणतात ऐका…
मोशी कचरा डेपोवर झालेली नैसर्गिक आपत्ती आणि त्यामध्ये ९ जणांचा झालेला मृत्यू ही पिंपरी-चिंचवडकरांसाठी संवेदनशील बाब आहे. या दुर्घटनेचे राजकारण करण्याची एकही संधी स्थानिक पातळीवर आणि राज्यस्तरीय नेत्यांनी सोडलेली नाही. आता कौटुंबीक वादाला महापालिका आणि राजकीय किनार देवून आमदार रोहीत पवार या प्रकरणातही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधून टिकेचा सूर उमटला आहे.





