भगवत गीतेच्या निर्मितीचा सार सांगत राज्यपालांचा जेन झी, जेन अल्फाशी संवाद

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या पाठोपाठ महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ‘आयआयएमयूएन’च्या व्यासपीठावरून जेन झी आणि जेन अल्फा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरूण पिढीशी संवाद साधला.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या या चार दिवसांच्या परिषदेच्या पहिल्या दिवशी डॉ. भागवत यांनी मुलाखतीच्या माध्यमातून तरूणांशी संवाद साधला. त्यानंतर परिषदेच्या सांगता सत्राला राज्यपालांनी हजेरी लावली. या परिषदेत देशाच्या १०० शहरांतील आणि पाच इतर देशांमधील सुमारे दोन हजार तरूण सहभागी झाले होते.
यावेळी राज्यपालांनी भगवत गीतेच्या निर्मितीचे सार सांगत तरूणांना आपल्यातील जिज्ञासा वृत्ती जपण्याचे आवाहन केले. कोणतीही गोष्ट जशी आहे तशी न स्वीकारता प्रश्न विचारणे हा पाश्चात्य विचार नसून तो अस्सल भारतीय विचार आहे. अर्जुनाने भगवान कृष्णाला प्रश्नच विचारला नसता तर ‘ग्रंथांचा ग्रंथ’ असलेली भगवतगीता निर्माण झाली नसती, असे राज्यपाल म्हणाले.
भारतीय पुराणात अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा व मंदोदरी या त्या काळातील बंडखोर होत्या. त्यांनी सरधोपट मार्ग न निवडता प्रस्थापितांना सवाल केला. सावित्रीने तर मृत्यूची देवता यमराजाला सवाल केला, असे उदाहरण त्यांनी दिले. उपनिषदांमधील ‘नेति नेति’ या उद्गारामुळे सत्यान्वेषण नवनव्या मार्गाने झाले. ही संकल्पना प्रश्न विचारणाऱ्या चौकस बुद्धीला चालना देणारी आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
आज जेन झी व जेन अल्फा यांच्या विचारांना लोक गांभीर्याने ऐकत आहेत. देश आणि जग कोणत्या दिशेने जाणार, हे या पिढ्या ठरवतील, असे आयआयएमयूएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी सांगितल
स्वातंत्र्याचा उपभोग नियमांच्या चौकटीतच
ठराविक नियमांच्या चौकटीतच स्वातंत्र्याचा खरा उपभोग घेता येतो असे सांगताना एखाद्या रागातील स्वरांची चौकट पाळली तर त्या चौकटीत वेगवेगळे गायक नवनवीन पद्धतीने गाऊ शकतात, असे राज्यपालांनी सांगितले. गाण्याचे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी ठराविक रागाची चौकट मात्र कसोशीने पाळली पाहिजे.





