केंद्रीय शिक्षणमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागणार? संजय राऊत यांचा मोठा दावा

मुंबई | पेपरफुटी प्रकरणाविरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (CJP) उभारलेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच एखाद्या केंद्रीय मंत्र्याला जनआक्रोशापोटी राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला असला, तरी देशाचा नवा शिक्षणमंत्री कोण होणार? याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नवी चर्चा छेडत मोठा राजकीय दावा केला आहे.
संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण खात्याच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. “या देशात जी राजकीय उलथापालथ झाली आणि मोदींची जी नाचक्की झाली, ती केंद्रीय शिक्षण खात्यामुळेच. १२ वर्षांत पहिल्यांदाच एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. देशातील तरुण आणि विद्यार्थी ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देत जंतर-मंतरसह रस्त्यावर उतरले. शिक्षण खातं हे देशाची नवी पिढी घडवणारं खातं असतं, मात्र तिथेच वाळवी लागल्याने पंतप्रधान मोदींना माघार घ्यावी लागली,” असे राऊत म्हणाले. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारला आता या खात्यासाठी एका उच्चशिक्षित आणि प्रशासकीय पकड असलेल्या नेत्याची गरज असून, त्या पदासाठी देवेंद्र फडणवीस हेच सर्वात योग्य नाव असल्याचे मोदींनाही ठाऊक आहे, असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा
बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवून सोनाराला ६.२९ लाखांचा गंडा
दिल्लीतील राजकीय गोटातील माहितीचा हवाला देत राऊत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी (देवेंद्र फडणवीस) थेट चर्चा केली आहे. “देशातील पहिल्या पाच महत्त्वाच्या खात्यांपैकी एक असलेल्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाची (शिक्षण मंत्रालय) जबाबदारी तुम्ही सांभाळा, असे मोदींनी फडणवीसांना सांगितले आहे. माझी ही माहिती पूर्णपणे पक्की आहे,” असा ठाम दावा त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. “फडणवीस केंद्रात गेले तर मुख्यमंत्री कोण, हा प्रश्नच येत नाही; कारण सध्या भाजपमध्ये दिल्लीतूनच राज्यांचा कारभार चालवण्याची परंपरा आहे. गुजरात, राजस्थान किंवा मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण आहे, हे कोणाला सहज आठवतं का? जो सर्वात कमी कार्यक्षम असतो, त्याला शोधून भाजप पदावर बसवते. परंतु, माझ्या माहितीनुसार मोदींनी फडणवीसांना आश्वासन दिले आहे की, महाराष्ट्रात त्यांच्याच पसंतीचा नेता मुख्यमंत्री केला जाईल. आता यावर फडणवीस काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.





