राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या रोमानिया दौऱ्याला यश; व्यापार दुप्पट, संरक्षण सहकार्य वाढवण्यावर शिक्कामोर्तब

India Romania Trade: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात झालेल्या रोमानिया भेटीमुळे भारत आणि रोमानिया यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दोन्ही देशांनी पुढील तीन ते पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि शिक्षणासह अनेक क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 1994 नंतर एखाद्या भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिलाच अधिकृत रोमानिया दौरा आहे. त्यामुळे या भेटीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे रोमानियाचे राष्ट्रपती निकुसोर डॅन यांनी औपचारिक स्वागत केले. त्यांना राजकीय सन्मानही देण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, अक्षय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, औषधनिर्मिती, शिक्षण, क्रीडा, संस्कृती आणि दोन्ही देशांतील नागरिकांमधील संपर्क वाढवण्यावर भर देण्यात आला. भविष्यात या सर्व क्षेत्रांमध्ये अधिक जवळून सहकार्य करण्याची तयारी दोन्ही देशांनी दर्शवली.
विशेषतः संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर मोठा भर देण्यात आला. संरक्षण उत्पादन, संरक्षण उद्योग, समुद्री सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि आधुनिक ड्रोन तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन, विकास आणि उत्पादन करण्याच्या संधींचा दोन्ही देशांनी आढावा घेतला. भारतीय संरक्षण क्षेत्रातील अनेक कंपन्या रोमानियासोबत संयुक्त प्रकल्प राबवण्यास उत्सुक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सिबी जॉर्ज यांनी सांगितले की, भारत आणि रोमानिया यांच्यातील व्यापार सातत्याने वाढत आहे. भारत आणि युरोपियन संघ यांच्यात मुक्त व्यापार करार झाल्यानंतर या व्यापाराला आणखी वेग मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील तीन ते पाच वर्षांत दोन्ही देशांमधील व्यापार दुप्पट करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.
या भेटीचा फायदा केवळ भारत-रोमानिया संबंधांपुरता मर्यादित राहणार नाही. भारत आणि युरोपियन संघ यांच्यातील संबंध अधिक मजबूत होण्यासही या दौऱ्यामुळे मदत होणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. जागतिक स्तरावरील विविध विषयांवर दोन्ही देश अधिक समन्वयाने काम करतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.





