यशस्वीचा ‘विराट’ धमाका! निर्णायक वनडेत भारताचा दणदणीत विजय, २-१ ने मालिका खिशात

India vs South Africa 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा वनडे सामना विशाखापट्टणमच्या मैदानावर पार पडला. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली होती. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ३५८ धावांचा डोंगर उभारला होता. तरीसुद्धा भारतीय संघाला गमवावा लागला होता. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक होता. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ केला आणि ९ गडी राखून विजयाची नोंद केली. यासह मालिकेवर २-१ ने कब्जा केला आहे.
भारतीय कर्णधारांचा गेल्या काही महिन्यांपासून बॅडलक सुरू होता. फॉरमॅट आणि कर्णधार बदलले पण एकाही भारतीय कर्णधाराला नाणेफेक जिंकता आलं नव्हतं. पण या सामन्यात एल राहुलने नाणेफेक जिंकलं आणि दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा डाव २७० धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना सलामीला आलेल्या क्विंटन डी कॉकने दमदार शतकी खेळी केली. त्याने १०६ धावा केल्या. तर कर्णधार तेंबा बावूमाने ४८ धावा केल्या. मॅथ्यू ब्रीत्ज्केने २४, डेवाल्ड ब्रेविसने २९ धावांची खेळी केली. शेवटी केशव महाराजने २० धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या २७० धावांवर पोहोचवली.
हेही वाचा – ‘आयकर आणि जीएसटीप्रमाणे सीमा शुल्कही होईल सुलभ’; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७१ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाची बॅटिंग लाईनअप पाहता हे आव्हान फार मोठं नव्हतं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. या दोघांनी भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १५५ धावा जोडल्या. रोहित शर्माला चांगली सुरूवात मिळाली होती. त्याच्याकडे शतक झळकावण्याची नामी संधी होती. पण ७५ धावांवर फलंदाजी करत असताना झेलबाद होऊन माघारी परतला.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जैस्वालने मिळून किल्ला लढवला. दोघांनी मिळून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यादरम्यान यशस्वी जैस्वालने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो स्वस्तात माघारी परतला होता. पण या सामन्यात त्याने शतक झळकावलं. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असलेला विराट कोहली देखील तुफान फॉर्ममध्ये होता. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये शतक झळकावल्यानंतर या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली. जर विजयासाठी आणखी काही धावा शिल्लक असत्या, तर विराटने या सामन्यातही शतक झळकावलं असतं. हा सामना भारतीय संघाने ९ गडी राखून आपल्या नावावर केला.





