मुंबईकरांसाठी गुड न्यूज! BKC ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पर्यंत सिग्नल-मुक्त कॉरिडॉर सुरू होणार

मुंबई : मुंबईत बहुप्रतिक्षित सांताक्रूज-चेंबूर लिंक रोड (SCLR) एक्स्टेंशन प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)ने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते वाकोला जोडणाऱ्या मुख्य उड्डाणपूल (एलिव्हेटेड आर्म)चे काम जवळपास पूर्ण केले आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर BKC ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (WEH) दरम्यान थेट आणि पूर्णपणे सिग्नल-फ्री कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. सुमारे 10.88 किलोमीटर लांबीचा हा पूर्व-पश्चिम कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सोपा होणार आहे.
प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात वाकोला नाल्यावर दोन स्तरांवर 54-54 मीटर लांबीचे ट्विन कंपोझिट गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आले आहेत. याच माध्यमातून BKC, वाकोला आणि इतर उड्डाणमार्ग जोडून वाहनचालकांसाठी सुमारे 11 किलोमीटर लांबीचा सिग्नल-फ्री मार्ग तयार करण्यात आला आहे. हा भाग BKCमधील भारत डायमंड बोर्सला वाकोला परिसराशी जोडतो आणि संपूर्ण नेटवर्कमधील अत्यंत महत्त्वाची कडी मानली जाते.
हेही वाचा – पुणे ते सातारा धो-धो बरसणार; नदी नाले तुडुंब भरणार; हवामानाचा नवा अंदाज काय?
MMRDA अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकल्प मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या भागात पूर्ण करण्यात आला असून पारंपरिक बांधकाम तंत्रज्ञान वापरणे शक्य नव्हते. त्यामुळे अभियंत्यांनी 700 टन आणि 500 टन क्षमतेच्या क्रेन्सच्या मदतीने फुल-स्पॅन लॉन्चिंग तंत्राचा वापर करून गर्डर बसवले. प्रत्येक गर्डरची लांबी 54 मीटर, रुंदी 8.5 मीटर आणि वजन सुमारे 358 टन आहे. बांधकामादरम्यान वाहतूक आणि सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली. BKC-वाकोला आर्मची लांबी जरी केवळ 1.4 किलोमीटर असली, तरी हा संपूर्ण SCLR नेटवर्कमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये 500 मीटर लांबीचा चार लेनचा उड्डाणमार्ग आणि 900 मीटर लांबीचे दोन लेन कनेक्टर समाविष्ट आहेत. यामुळे वाहतूक विविध दिशांना विभागली जाईल आणि प्रमुख चौकांवरील ताण कमी होईल.
SCLR एक्स्टेंशन सुरू झाल्यानंतर सांताक्रूज, वाकोला, कालिना, कुर्ला, चेंबूर, कलानगर आणि BKC या भागांदरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होईल. तसेच ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (WEH) यांना BKCमार्गे थेट, सिग्नल-फ्री जोडणी मिळेल. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन ट्रॅफिक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.





