“ठाकरे बंधूंची युती पक्की”; संजय राऊत यांचा दावा; ठाणे निवडणुकीत ‘७५ पार’चा नारा

मुंबई | “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती पक्की आहे,” असं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ज्यांना आमच्यासोबत यायचं आहे, त्यांचं स्वागत आहे, असंही ते म्हणाले. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत “७५ पारचा नारा” देत आम्ही बहुमताने विजय मिळवू, असा दावा त्यांनी केला.
खासदार संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामुळे ज्यांना आमच्यासोबत यायचं असेल त्यांचं आम्ही स्वागत करू. ही युती पक्की आहे. मी महाविकास आघाडी बद्दल देखील वारंवार सांगत आलो आहे. जे सोबत येतील त्यांना आम्ही घेऊन पुढे जाऊ.
हेही वाचा : अमृतसरहून बिहारला जाणाऱ्या गरीबरथ एक्सप्रेसला आग; तीन डबे जळून खाक
महाविकास आघाडीत राज ठाकरे सहभागी होणार का, या प्रश्नावर राऊत म्हणाले, मी अनेकदा स्पष्ट केलं आहे की महाविकास आघाडी ही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी होती. इंडिया ब्लॉक हा लोकसभा निवडणुकीसाठी होता. तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अशी कुठलीही आघाडी नसणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अद्याप अशा प्रकारची कुठलीही चर्चा कोणत्याही पक्षांमध्ये झालेली नाही.
शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत. मुंबईसाठी व मराठी माणसाला वाचवण्यासाठी आम्ही आणि मनसे एकत्र लढणार आहोत. ठाण्यात देखील आम्ही एकत्र लढणार आहोत आणि सत्तेत येणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
महायुतीने ठाण्यात ७० पारचा नारा दिला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, आमचा नारा ‘७५ पार’चा आहे. दोन ठाकरे एकत्र आल्यावर काहीही शक्य होऊ शकतं. ‘दो ठाकरे सब पे भारी’, निवडणूक लढण्यावर चर्चा होत राहील. हा सोबत येणार का तो सोबत येणार हे अजून ठरलं नसलं तरी या क्षणी दोन ठाकरे हे एकत्र असून ते सर्वांच्या ठिकऱ्या करतील.





