प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय नौदलाचा चित्ररथ यावर्षी खास
नौदलाच्या चित्ररथात INS वागशीर, INS सूरत आणि INS नीलगिरीचा समावेश

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय नौदलाचा चित्ररथ यावर्षी खास असणार आहे. यावर्षी सामील करण्यात आलेल्या पाणबुड्या आणि युद्धनौका लष्कराच्या चित्ररथामध्ये दिसणार आहे. INS वागशीर, INS सूरत आणि INS नीलगिरी ला याचा भाग बनवण्यात येणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात अनेक राज्यांचा चित्ररथ केला जातो आणि अनेक राज्यांचा नाकारला जातो. मात्र जेव्हा चित्ररथ नाकारला जातो तेव्हा त्याचे कारणही दिले जाते. प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ निवडण्याचे काम संरक्षण मंत्रालयाकडून केले जाते. चित्ररथ निवडण्याची आणि त्याला हिरवा सिग्नल देण्याची प्रक्रिया असते. जाणून घेऊ प्रजासत्ताक दिनासाठी चित्ररथ कसा निवडला जातो.
प्रजासत्ताक दिनासाठी कसा निवडला जातो चित्ररथ?
प्रजासत्ताक दिनाच्या आयोजनाची जबाबदारी संरक्षण मंत्रालयाची असते म्हणून संरक्षण मंत्रालयाकडून चित्ररथासाठी अर्ज मागवले जातात. साधारणपणे त्याची तयारी सप्टेंबर महिन्यापासून सुरू होते. अनेक वेळा ही प्रक्रिया ऑक्टोंबर मध्ये सुरू होते. चित्ररथाची निवड करण्यासाठी संरक्षण मंत्रालय एक निवड समिती स्थापन करते. या समितीमध्ये संगीत, वास्तू कला, चित्रकला, नृत्यदिग्दर्शन, शिल्पकला अशा विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असतो. तज्ञ समिती सर्वप्रथम चित्ररथाचा विषय, डिझाईन आणि संकल्पना तपासते. हा पहिला टप्पा आहे ज्यामध्ये चित्राच्या स्वरूपात चित्ररथ सादर केला जातो त्यातून त्याचे गुण उलगडले जातात.
हेही वाचा : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांना शपथ
पहिला फेरीनंतर अर्जदारांना चित्ररथाचे थ्रीडी मॉडेल पाठवण्यास सांगितले जातात. दुसऱ्या फेरीत निवड झाल्यानंतर चित्ररथ तयार करण्याचे काम सुरू होते. संरक्षण मंत्रालयाच्या मते चित्ररथाची निवड अनेक बाबींवर अवलंबून असते. उदाहरणार्थ चित्ररथ कसा दिसतो? त्याचा लोकांवर किती परिणाम होईल? त्यात कोणत्या प्रकारचे संगीत वापरले जाईल? यासारख्या बाबींचा विचार केला जातो.
या गोष्टींची घेतली जाते काळजी
चित्ररथ निवडण्याची प्रक्रिया सहा ते सात टप्प्यात होते. अनेक मानकांची पूर्तता केल्यानंतर काही चित्ररथांची निवड केली जाते. काही कमतरता जाणवल्यास काही बदल करण्यास सांगितले जाऊ शकतात. संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दोन राज्यांचे चित्ररथ एकसारखे नसावेत. याशिवाय एकसारखे हस्ताक्षर किंवा डिझाईनही नसावे. राज्याचे नाव हिंदी किंवा इंग्रजीत असणे आवश्यक असते. बाजूंना इतर भाषेत नावे लिहिली जाऊ शकतात.
मार्गदर्शक तत्वानुसार पर्यावरण पूरक साहित्य वापरण्याला प्रथम प्राधान्य द्यावे लागते. याशिवाय मंत्रालयाकडून चित्ररथासाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉली उपलब्ध करून दिल्या जाते. यासारख्या अनेक टप्प्यानंतर चित्ररथ निवडला जातो.





