चंद्रकांत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला

पुणे : राज्यात आज बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे.
नुकतेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मतदानाचे आवाहन केले. “मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. मी लोकांना आवाहन करतो की या आणि मतदान करा. आम्ही 20-25 स्वयंसेवी संस्थांना लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले आहे,” असेही त्यांनी म्हंटले आहे.
तसेच चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत लिहिले की, “मतदान करणे हे आपले कर्तव्य आणि लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. आज सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या कोथरुडमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. विकसित भारताच्या निर्मितीसाठी, महाराष्ट्राला प्रगतीपथावर आरुढ ठेवण्यासाठी तसेच आपली भारतीय लोकशाही समृध्द करण्यासाठी अवश्य मतदान करा, असे आवाहन मी करतो.”
दरम्यान, आज सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. राज्यातील 9.7 कोटी मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी राज्यातील 1 लाख 427 मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण सज्जता केली आहे.





