‘प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले’; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

Uddhav Thackeray | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. त्यांनी राहुल गांधी यांच्या तोंडून बाळासाहेबांचं कौतुक करून दाखवावं असे ते म्हणाले. यावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं आव्हान स्वीकारत प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, की कालपरवा पंतप्रधान मोदी राज्यात येऊन गेले. त्यांनी मला आव्हान दिलं की मी राहुल गांधी यांच्या तोंडून बाळासाहेंबाबाबत दोन शब्द चांगले बोलून दाखवावं. काल प्रियांका गांधी शिर्डीत आल्या होत्या, तेव्हा त्या बाळासाहेबांबाबत भरभरून बोलल्या. त्यांनीच भाजपाचे दात घशात घातले. खरं तर तोडा फोडा आणि राज्य करा हीच भाजपाची निती आहे.
हेही वाचा – ‘मी शरद पवारांना सोडलेलं नाही’; अजित पवारांचं मोठं विधान
आपलं सरकार गद्दारी करून पाडण्यात आलं. कारण तर त्यांना महाराष्ट्र लुटायला होता आणि मी तो लुटू देत नव्हतो. म्हणून त्यांनी पहिला घाव शिवसेनेवर घातला. मिंधेंना कळत नाही. वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची निती आहे. निवडणुकीच्या प्रचारात अमित शाह बोलले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. याचा अर्थ मिंधे गटाचा उपयोग संपला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पाटणमध्ये एक गद्दार आहे. तो राज्यातील मंत्री लुटमार मंत्री आहे. त्याने मंत्री असताना सरकारी पैशांचा वापर कसा केला हे मला माहिती आहे. फक्त सत्ता येऊ द्या, त्यानंतर यांची सगळी प्रकरणं मार्गी लावतो. याच गद्दाराने पाटणमध्ये उद्योग का आणले नाही? हे त्याला विचारा. या लोकांना मी सर्व दिले. तरीही यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला. गद्दारी करुन ते सुरतला गेले. तिकडून गुवाहाटीला गेले, असा इशारा उद्धव ठाकरेंनी शंभूराज देसाऊ यांना दिला.





