‘महाराष्ट्रातील जनता लवकरच हिशेब करणार’; प्रियांका गांधींची महायुतीवर टीका

Priyanka Gandhi | काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत रत्नागिरीमधील रेल्वे स्थानकाचे छत उद्घाटनाआधीच कोसळल्याचा दावा केला आहे. राज्यातील मुंबई-नाशिक महामार्ग, सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर काही महिन्यांतच कोसळला, अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला खड्डे पडले, अशा काही कामांचा दाखला देत प्रियांका गांधी यांनी महायुती सरकारच्या काळात झालेल्या कामांच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात खोके आणि धोके सरकार असून येथील जनता लवकरच हिशेब करेन, असा हल्लाबोल प्रियांका गांधी यांनी केला आहे.
https://x.com/priyankagandhi/status/1843279620562653641
हेही वाचा – ‘महाविकास आघाडीला १८३ जागा मिळतील’; पृथ्वीराज चव्हाण
प्रियंका गांधींनी नेमकं काय म्हटलं?
महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील रेल्वे स्थानकाचे छत उद्घाटनापूर्वीच कोसळले आहे. दुसरीकडे मुंबई-नाशिक महामार्ग जो अद्याप पूर्णत: तयारही झाला नव्हता. त्यात ५०० हून अधिक खड्डे पडले आहेत. यापूर्वी सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर काही महिन्यांतच कोसळला. मुंबईत १८ हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला खड्डे पडले आहेत. महाराष्ट्रातील खोके आणि धोके सरकारने विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून अगणित भ्रष्टाचार केला आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता याचा लवकरच हिशेब करणार आहे, असा इशारा प्रियांका गांधी यांनी महायुतीला दिला आहे.





