श्रीलंकेत परिस्थिती बिकट; लोकं भारतात परतू लागले

कोलोम्बो | श्रीलंकेत परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. इंधनाचे दर वाढल्याने महागाई देखील वाढली आहे. इतर जीवनावश्यक वस्तू देखील मोठ्या प्रमाणात महागल्या आहेत. अनियंत्रित महागाई आणि आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील लोकं आता देश सोडून जात आहेत.
श्रीलंकेतील लोक आपला देश सोडून भारतात येत आहेत. मंगळवारी 16 श्रीलंकन तमिळ नागरिकांनी आपला देश सोडला आणि भरपूर पैसे देऊन बोटीने तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचले. या लोकांमध्ये चार महिन्यांच्या नवजात बालकाचाही समावेश आहे.
श्रीलंकेतील जाफना आणि तलाईमन्नार येथून दोन गटात हे लोक तामिळनाडूत पोहोचले. पहिल्या गटात तीन मुलांसह सहा जणांचा समावेश होता. श्रीलंकेतील या लोकांमध्ये चार महिन्यांचा मुलगा असलेल्या जोडप्याचा समावेश आहे. हे सर्व लोक फायबर बोटीतून किनारपट्टीवर पोहोचले जेथे तटरक्षक दलाने त्यांची सुटका केली. दुसऱ्या गटात पाच मुले आणि तीन महिलांसह १० जणांचा समावेश होता.





