आळंदी, तळेगाव मध्ये दोन अपघात : दोघांचा मृत्यू

पिंपरी | प्रतिनिधी
आळंदी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाताच्या दोन घटना घडल्या. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. 8) आळंदी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
आळंदी पोलीस ठाण्यात दिलीप श्रीपती गायकवाड (वय 64, रा. धनकवडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजय शेषराव मुंडळकर (वय 26, रा. शिरूर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 2 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील सोळू गावच्या हद्दीत फिर्यादी यांचे साडू निलेश देविदास उमाप (वय 44, रा. च-होली बुद्रुक) त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यांच्या दुचाकीला आरोपीच्या ट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रकची दुचाकीला धडक बसली. यामध्ये फिर्यादी यांचे साडू निलेश उमाप हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. 7) रात्री सात वाजताच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे येथे एका अज्ञात वाहनाने विजय लक्ष्मण जाधव (वय 40, रा. दतेडी बुद्रुक, ता. जि. बुलढाणा) यांना धडक दिली. यामध्ये विजय जाधव यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालक पळून गेला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.





