विदर्भातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्या, देवेंद्र फडणवीसांची सरकारकडे मागणी

नागपूर: पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात महापुरामुळे हाहाःकार उडवलेला आहे. काही भागात पुराचं पाणी ओसरलेलं आहे. पण समस्यांचा महापूर कायम आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील पूर नुकसानीची पाहणी केली आणि सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी केलेली आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झुल्लर गावाला महापुराचा मोठा फटका बसला आहे.
घरांची पडझड झाली, घरात चीखलाचं याम्राज्य आहे. धान्य भीजल्याने लोकांना खायला अन्न नाहीये. याच गावात आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीची पाहणी केली आहे. पूरग्रस्त भागातील लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि तात्काळ मदतीची मागणी केलेली आहे. कोल्हापूर आणि सांगलीच्या पुरात ज्याप्रकारे जीआर बदलून तत्कालीन सरकारने मदत केली होती. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना सरकारनं तात्काळ मदत करावी, सर्व्हेच्या आधी काही रोकड मदत करावी, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.





