दिशा सालियन प्रकरणाचा तपास आता CBIकडे; आदित्य ठाकरेंनी आरोप फेटाळले
CBI चौकशीतून सत्य समोर येणार; नितेश राणेंकडूनही तपासाचे स्वागत

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.
माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “याच्याशी माझा काहीही संबंध नाही आणि मी याचा विचारही केलेला नाही. मग मी यावर उत्तर का द्यावे?” भाजपकडून गेल्या सहा वर्षांपासून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या किंवा पक्षाला खटकणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य केले जाते. एखाद्या प्रकरणाशी आपला संबंध नसताना त्यावर बोलण्याची किंवा त्याला महत्त्व देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, ज्यांची नावे या प्रकरणाशी जोडली जात आहेत त्यांनी पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले आहे. दिशा सालियन यांचा मृत्यू सुरुवातीपासूनच आत्महत्या म्हणून पाहता कामा नये, अशी आपली भूमिका असल्याचेही राणे यांनी सांगितले.
CBIकडून अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती
मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्याचे निर्देश देताना अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास सांगितले आहे. तपासादरम्यान गुन्हा दाखल करण्यासारखे काही आढळून आले नाही, तर संबंधित न्यायालयात योग्य तो अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
आता CBIच्या तपासातून या प्रकरणातील नेमके सत्य समोर येते का, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.





