जिल्हा परिषदेच्या १०० शाळा बंद होण्याच्या मार्गावर
वाडा: ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत २० पेक्षा कमी पटसंख्या असेल अशा शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पालघर जिल्ह्यात पटसंख्या कमी असलेल्या १०० हून अधिक शाळा असून या निर्णयामुळे त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी भागात आज ५ ते १० पटसंख्या असलेल्या शंभरहून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यामधील काही शाळांमध्ये दोन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेतील विद्यार्थी जवळपास असलेल्या शाळांना जोडण्याचा निर्णय शासन लवकरच आमलात आणत आहे.
आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने पाडा तेथे शाळा सुरू केल्या आहेत. मात्र या पाडा वस्तीवरील बहुतांशी कुटुंबे वर्षभरातील सहा ते सात महिने रोजगारासाठी स्थलांतरित होतात. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या पाडावस्तीवरील शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या ५ ते १० विद्यार्थ्यांवर येत असते.
शाळा बंद करण्यास विरोध
आदिवासी पाडा वस्तीवर पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळा असतात. त्या बंद पडल्या तर विद्यार्थ्यांना पाडा वस्तीपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या शाळेत स्थलांतर करावे लागेल. डोंगर कपारीत व जंगल वस्तीत राहणारे विद्यार्थी रोज एवढय़ा अंतरावरील शाळेत कसे जातील, पावसाळय़ात लहान मोठे नाले कसे पार करतील असा प्रश्न आदिवासी संघटनांनी उपस्थित केला आहे. शासनाने हा निर्णय रद्द न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा पालघर जिल्ह्याचे आदिवासी युवा संघटनेचे प्रवक्ते संतोष साठे यांनी दिला आहे.