1 सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार
नवी दिल्ली | 1 सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार आहे. 1 सप्टेंबर 2020 पासून अनलॉकचा पुढचा टप्पा सुरु होतोय. अनलॉक 4 साठी केंद्र सरकारच्या गाइडलाइन्स लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. त्यात आतापर्यंत बंद असलेल्या मेट्रो सेवेला काही प्रमाणात हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकारकडे तशा पद्धतीची मागणी केली होती. कोरोना विषाणू संसर्गामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता टप्प्याटप्प्याने अनलॉची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत अनलॉकचे 3 टप्पे पूर्ण झाले आहे. 31 ऑगस्टला अनलॉक 3 संपणार आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून अनलॉक 4 सुरु होणार आहे.
यानुसार अनेक गोष्टींमध्ये सुट मिळण्याची शक्यता आहे. यात मोठ्या शहरांमधील मेट्रो सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार असल्याची माहिती मिळत आहे. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांशी व्यापक चर्चा केल्यानंतर, शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी देणाऱ्या कोचिंग संस्था 31 ऑगस्ट 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय अनलॉक 3 दरम्यान घेण्यात आला होता. त्यामुळे शाळा, कॉलेज संदर्भात अद्याप माहिती मिळाली नाही.
दरम्यान, राज्यात सप्टेंबरपासून शाळा, कॉलेज उघडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत.