होळीच्या आगीत भस्म होवोत सर्व कुविचार आणि सर्वांच्या आयुष्यात होवो रंगांची बहार…
फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे ‘रंगपंचमी’… यादिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून ही पंचमी साजरी केली जाते ..म्हणून या पंचमीला रंगपंचमी असं नाव देण्यात आलं… फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी असते. त्यानंतर दुसर्या दिवशी धुळवड असते. फाल्गुन वद्य पंचमीला रंग उधळण्याचा कार्यक्रम असतो; म्हणून ती रंगपंचमी असते; पण या तिन्हींना होळीच म्हटलं जाते…
फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, फाग,फागुन “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. होळीच्या दुसर्या दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते..
विविध रंगांची पावडर पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यांमधून एकमेकांच्या अंगावर उडवले जातात . किंवा बुरा ना मानोहोली है.!!!! असं म्हणत कपाळाला गुलाल किंवा रंग लावला जातो…… पूर्वी होळी म्हटले, की फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ,हळद, बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार केले जातात. या रंगांमुळे रंगपंचमीचा आनंद द्विगुणित होई.
द्वापरयुगात गोकुळात बाल/कुमार कृष्ण आपल्या गोपाळसवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे. रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची रीत आहे…या उत्सवाच्या निर्मितीमागचे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहे. परंतु वसंत ऋतू, मदन, नववर्ष, जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण करण्याचा यातुविधी इत्यादींशी हा उत्सव निगडित असावा.
धर्मसिंधु या ग्रंथाच्या मते फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंतारंभाचा उत्सव सुरू होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का वगैरे उधळून आनंदसोहळा साजरा केला जातो. यावरून रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे, असे दिसते. पुराणकथेनुसार शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाळले होते. त्यानंतर त्याने अनंगरूपाने त्याला पुन्हा जिवंत केल्याचा आनंद व्यक्त करणे, हा देखील या उत्सवामागचा हेतू असण्याची शक्यता आहे… रंगपंचमी हा नववर्षाच्या स्वागताचा उत्सवही असण्याची मानला जातो. जीर्ण झालेली सृष्टी होळीमध्ये जळून नष्ट झाली असून आता नव्या सृष्टीचा उदय झाला आहे, असेही या आनंदोत्सवातून सूचित केले जात असावे.
रंगपंचमी हा रंगांचा उत्सव. एकमेकांवर रंग उधळून परस्परांमधील प्रेम वृद्धींगत करण्याचा हा दिवस. या वेळी वापरण्यात येणारे रंग हे नैसर्गिक असलें तर आणखीणच उत्तम… होळीच्या आगीत होवो भस्म सर्व कुविचार आणि सर्वांच्या आयुष्यात होवो रंगांची बरसात…