हिलसामध्ये अडकलेल्या 200 कैलास मानसरोवर यात्रेकरूंची सुटका
काठमांडू (नेपाळ) – नेपाळमधील हिलसा या पर्वतीय क्षेत्रात अडकून पडलेल्या सुमारे 200 भारतीय यात्रेकरूंची आज सुटका करण्यात आली. कैलास मानसरोवर यात्रा करून परतणारे हे यात्रेकरू मुसळधार पावसामुळे हिलसा भागात अडकून पडले होते. सिमिकोट येथून आणखी 119 यात्रेकरूंची सुटका करण्यात आल्याचे माहिती भारतीय दूतावासाने एका निवेदनाद्वारे दिली आहे.
नेपाळगंज-सिमिकोट-हिलसा भागावर भारतीय दूतावास लक्ष ठेवून आहे. खराब हवामानामुळे अडकून पडलेल्या यात्रेकरूंची सुटका करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय केले जात आहेत. हिलसा-सिमिकोट भागात हेलिकॉप्टर्सनी 35 फेऱ्या मारून सुमारे 200 यात्रेकरूंची सुटका केल्याची माहिती दूतावासाने दिली आहे.
आवश्यकता पडल्यास चार्टर्ड हेलिकॉप्टर्स घेण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले आहे. सिमिकोट येथे राहण्यची, भोजनाची आणि वैद्यकीय सुविधा असली, तरी हिलसा येथे फारशा पायाभूत सुविधा नाहीत. सिमिकोट येथून 5 व्यावसायिक आणि 3 नेपाळ लष्कराच्या हेलिकॉप्टर्सची उड्डाणे करून 119 यात्रेकरूंना सिमिकोटवरून सुरखेत येथे आणले आहे. सुरखेतहून नेपाळ्गंज येथे जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यात्रेकरू आणि त्यांचे नातेवाईक-मित्रमंडळी यांच्यासाठी हॉटलाईनची सुविधा पुरविण्यात आलेली आहे.
केरळच्या लीला नारायण मांद्रेदथ (56) आणि आंध्र प्रदेशच्या सत्या लक्ष्मी या दोन यात्रेकरूंचे उंच ठिकांणावरील आजारपणामुळे आणि हार्ट अटॅकमुळे सोमवारी निधन झाले. त्यांचे मृतदेह हेलिकॉप्टरच्या साह्याने काठमांडू आणि नेपाळगंज येथे आणण्यात आलेले आहेत.