हिंसाचाराला विकास हेच उत्तर – पंतप्रधान
- छत्तीसगडमध्ये विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
भिलाइ (छत्तीसगड) – हिंसाचाराला विकास हेच एकमेव उत्तर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधानांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आपले सरकार विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले. छत्तीसगडमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. त्यापर्श्वभुमीवर पंतप्रधानांनी याप्रसंगी राज्यातील भाजप सरकारने आणि केंद्र सरकारने केलेल्या विविध कार्याचा अढावा घेतला.
“हिंसाचार आणि कोणत्याही प्रकारच्या कारस्थानांना विकास हेच एकमेव उत्तर असू शकते. नक्षलग्रस्तांच्या हिंसाचारामुळे त्रस्त राज्यातील जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठीच खनिजांसारख्या नैसर्गिक स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न स्थानिकांच्या कल्याणासाठी वापरण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.’ असे त्यांनी सांगितले. यातून छत्तीसगडला 3 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला आहे. त्याचा विनियोग रुग्णालये, शाळा, रस्ते आणि स्वच्छतागृहांसाठी केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील आदिवासी आणि मागास भागातील रहिवाशांचे उत्पन्न वाढवण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले. आज उद्घाटन केलेल्या विकास कामांमध्ये जगदलपूर आणि रायपूरदरम्यानच्या विमानसेवेचाही समावेश आहे.