हिंगोली जिल्ह्यात ६ ऑगस्टपासून १४ दिवसांचा लॉकडाऊन घोषित
हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी गुरुवार ६ ऑगस्टपासून १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला असून या काळात सर्व दुकाने बंद राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. यावेळी जयवंशी यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा सामुदायिक संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. त्यानंतर सर्व विभागांशी चर्चा करून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. ६ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या कालावधीत हा लॉकडाऊन घेतला जाईल. यावेळी जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद राहतील. तसेच खाजगी अस्थापनादेखील बंद राहतील. तर केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. याशिवाय जिल्ह्यात येणाऱ्या तसेच जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तींना परवानगी घेणे बंधनकारक आहे. सबळ कारण असल्याशिवाय त्यांना परवगानी दिली जाणार नाही.
याशिवाय हिंगोली, कळमनुरी, वसमत या शहरात दुकानदारांच्या रॅपीड अँटीजन चाचण्या केल्या जाणार आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेच हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जयवंशी यांनी दिली आहे.