हर्षवर्धन जाधवांचं मनसेत पुनरागमन, राज ठाकरेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी
औरंगाबाद | महाईन्यूज |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पुनरागमन करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना एक खास बक्षिस दिल आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हर्षवर्धन जाधवांकडे मनसेच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे फायरब्रँड नेते चंद्रकांत खैरेंवर जाधवांची तोफ धडाधडताना दिसणार आहे.
नवीन झेंडा आणि नवीन अजेंडा जाहीर केल्यानंतर मनसे आता पक्षाला आलेली मरगळ झटकायला सुरुवात करत आहे. औरंगाबाद निवडणुकीकडे मनसेने लक्ष केंद्रित केलं आहे. मनसे तिथीनुसार शिवजयंती सोहळा औरंगाबादमध्ये साजरा करणार आहे. त्यादृष्टीने औरंगाबादमध्ये मनसेने वातावरणनिर्मितीला सुरुवात केली आहे.
औरंगाबाद निवडणुकीआधी पक्षात्मक बांधणी सुरु आहे. मनसेत नव्याने आलेले हर्षवर्धन जाधव आणि सुहास दशरथे यांना औरंगाबाद जिल्ह्याचं अध्यक्षपद सोपवून नवीन जबादारी देण्यात आली आहे. औरंगाबाद पालिका निवडणुकीसाठी मनसेने आता बूथ स्तरावर सर्व तयारी केली आहे.