हनुमान जाटच: भाजपा नेत्यांचे ‘रामायण’ सुरूच
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हुनमान हे दलित आणि वंचित होते, असे म्हटले होते. हा वाद शांत होतो ना होतो तोच भाजपा नेत्यांनी आणखी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपाचे आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमानजी मुस्लीम होते असा दावा केला होता. यात भर म्हणून योगींच्या एका मंत्र्यांनी हनुमान जाट असल्याचा दावा केला आहे. भाजपा नेत्यांच्या अशा वक्तव्यामुळे राजकरणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपाचे कॅबिनेट मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी विधानसभा कार्यवाही दरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राजस्थानमध्ये हुनमान हे दलित आणि वंचित होते, असे म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष नंद कुमार साय यांनी हनुमानजी दलित नाही तर आदिवासी आहेत. त्यांनी आदिवासीयांमध्ये हनुमान गोत्र असल्याचा दावा केला होता. यामध्ये गुरूवारी सकाळी आमदार नवाब यांनी ‘एएनआय’शी बोलताना हुनमानजी मुस्लीम असल्याचा दावा केला. ते म्हणाले, माझं मत आहे की, हनुमान हे मुस्लीम होते. त्यामुळेच मुसलमानांमध्ये मुलांना जी नावे ठेवली जातात ती रहमान, रमजान, फर्मान, झीशान, कुर्बान सारखी जेवढीही नावे ठेवली जातात ती हनुमानांवरच ठेवली जातात. गुरुवारी भाजपाच्या आणखी एका नेत्याने हनुमानजीवर वादग्रस्त वक्तव्य करत यात भर टाकली. उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री असलेले चौधरी लक्ष्मी नारायण यांनी हनुमानजी जाट असल्याचे वक्तव्य केले आहे.
गुरूवारी विधान परिषदेमध्ये प्रश्न-उत्तराच्या काळात बोलताना लक्ष्मी नारायण यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, हनुमानजी माझ्याच जातीचे आहेत. लक्ष्मी नारायण जाट आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, लक्ष्मी नारायण यांचे हे वक्तव्य ऐकूण सभाग्रहात एकच हशा पिकला होता. काही वेळात त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सभाग्राहात गोंधळ सुरू झाला. विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला.
यानंतर विधानभवनाबाहेर एएनआयशी बोलताना त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, ‘जर कोणावर अन्याय होत असेल तर काहीही समजून न घेता त्यामध्ये जाट उडी घेतात. असेच हमुनाजीचे आहे. रावणाच्या तावडीतून सीता माताला सोडवण्यासाठी हनुमानजीने कोणताही विचार न करता भगवान रामाला मदत केली. हनुमानजीची प्रवृती जाटच्या प्रवृतीशी मिळतीजुळती असल्यामुळे हनुमानजी जाट आहेत.’
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी हुनमान हे दलित आणि वंचित होते, असे म्हटले होते. बजरंगबली हे एक असे देव आहेत. जे स्वत: वनवासी, निर्वासित, दलित आणि वंचित आहेत भारतीय समाजाला उत्तर ते दक्षिण पर्यंत आणि पूर्व ते पश्चिम पर्यंत सर्वांना जोडण्याचे काम बजरंगबलींनी केले आहे. या वक्तव्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. विरोधी पक्षच नव्हे तर भाजपाच्याच काही मंत्र्यांनी योगींवर निशाणा साधला होता. देवाला पण जातीवर विभागणे चुकीचे असल्याचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी म्हटले होते.