पिंपरी / चिंचवड
स्थायी समितीच्या कारभाराची ‘सीआयडी’ चौकशी करा- मारुती भापकर
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत ऐनवेळचे, वाढीव खर्चाचे विषय आणि ठेकेदारांची बिल अडविण्याच्या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषन विभाग (सीआयडी) मार्फेत चौकशी करण्याची मागणी, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. तसेच ठक्केवारीसाठी ठेकेदांराची बिले अडविल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत भापकर यांनी पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भय, भ्रष्टाचार मुक्त महापालिका आणि पारदर्शक कारभाराची भाजपने घोषणा केल्याने शहरातील जनतेने आपल्या पक्षाला एकहाती सत्ता मिळवून दिली.
सीमा सावळे यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारताच आपल्याला टक्केवारी माहीतच नसल्याचे सांगितले होते. ऐनवेळचे, वाढीव खर्चाचे विषय स्विकारणार नसल्याचे, जाहीर केले होते. अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांची साखळी उद्धवस्त करु असेही, त्यांनी सांगितले होते.
पंरतु, स्थायीच्या दुस-याच सभेत त्यांना त्यांच्याच घोषणेचा विसर पडला. बुधवारी (दि.12) झालेल्या स्थायीच्या सभेत प्रधानमंत्री आवाज योजनेसाठी सल्लागार नेमण्याचा सव्वा कोटीच्या ऐनवेळच्या विषय मंजूर केला आहे. तर, याच सभेत स्मार्ट सिटीचा सल्लागार नेमण्याचा ‘क्रिसिल’ संस्थेचा विषय लांबणीवर टाकण्यात आला होता. या संस्थेमुळे अनेक प्रकल्पांचे नुकसान झाल्याचे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले होते. त्यानंतर बुधवारी (दि.19) झालेल्या स्थायी सभेत ‘क्रिसिल’ची सल्लागार पदी नेमणूक करण्याच्या 63 लाख 25 हजार रुपयांच्या विषयाला मंजूरी देण्यात आली. तसेच याच सभेत वाढीव खर्चाला देखील मान्यता देण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष संपल्याचे कारण पुढे करत भाजप पदाधिका-यांच्या सांगण्यावरुन महापालिकेच्या मुख्य लेखापालांनी ठेकेदारांची बिले अडवून ठेवली आहेत. ठेकेदारांची बिले अदा करताना ज्या कामांना रीतसर मंजूरी मिळालेली आहे. जी कामे मंजूर झाली असून पैशांची तरतूद आहे, अशी बिले कुठेही अडविली नाहीत. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने टक्केवारीसाठी ठेकेदारांची बिले अडविले असल्याचेही, भापकर यांनी पत्रात म्हटले आहे.
ऐनवेळचा विषय व सल्लागार नियुक्ती, वाढीव खर्च आणि ठेकेदारांची बिले अडविण्यामध्ये कोट्यावधीचे गैरव्यवहार, भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीयडी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी, भापकर यांनी केली आहे. तसेच यामधील दोषींवर कठोर शिक्षा करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.