सोशल डिस्टन्सींगचे पालन न केल्यास कठोर पावले उचलावी : महापौर माई ढोरे
पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सोशल डिस्टन्सींगचे पालन न केल्यास भविष्यात प्रशासनाने कठोर पावले उचलावी अशा सुचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी प्रशासनाला दिल्या.
आज महापौर यांच्या दालनात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या संदर्भात झालेल्या बैठकीच्या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, प्रा. उत्तम केंदळे, नगरसदस्या कमल घोलप, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेवराव ढाके म्हणाले प्रशासनाची आज पर्यंतची कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारची आहे. परंतु नागरिकांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी नियमांचे पालन केले पाहिजे. किराणा, फळे व भाजीपाला, मांस-मटण तसेच दुध डेअरीमधील उत्पादने विक्री करणा-या विक्रेत्यांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे महत्वाचे असून नागरिकांनी देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वत:ची तसेच इतरांचीही काळजी घेणे आवश्यक असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे नियम व मनपाने दिलेल्या सुचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. सोशल डिस्टन्सींगचे पालन न केल्यास संबधित दुकानदार व ग्राहक यांच्यावर कलम १४४ अंतर्गत कार्यवाही करावी. सद्या शहरात नागरिक संचारबंदी उठविल्यासाखे वावर करताना दिसत असुन पोलीस प्रशासन सुध्दा या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. तसेच दुचाकी वाहनावर एक व्यक्ती व चारचाकी वाहनात वाहनचालक व दोन व्यक्ती असाव्यात या नियमांचे पालन न केल्यास त्यांचेवरदेखील नियमानुसार कारवाई करणेकामी पोलीस यंत्रणेस कळविणेत यावे. तसेच नागरिकांनी सुध्दा कोरोना स्वयंसेवक म्हणून काम करुन असे नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास असे करणाऱ्यांचे फोटो/व्हिडीओ महापालिका किंवा पोलीसांच्या व्हॉटअप गृपवर कारवाईस्तव टाकण्यात यावे जेणेकरुन कोरोना प्रसार रोखण्यास मदत होईल. सद्या शहरामध्ये सर्वत्र सोशल डिस्टन्सींगचे पालन होत नसल्याचे दिसुन आलेले आहे. सोसायट्यांचे पार्कींग, मोकळ्या जागा उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, भाजीपाला विक्री केंद्रे, किराणा, दुध विक्री आदी ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने नियमांचे उल्लंघन करताना दिसुन येत आहे. शहरातील नागरिकांनीदेखील आपल्या शहरावर इतर शहरांसारखी परिस्थिती उद्भवु नये अशा प्रकारची काळजी घ्यावी. अन्यथा आपल्याला सुध्दा शहर पुर्णपणे बंद करावे लागेल किंवा जनता कर्फ्पुची अमंलबजावणी करावी लागेल. तसेच जेष्ठ नागरिक व रक्तदाब, मधुमेह बाधित नागरिक असतील त्यांनी शक्यतो घराबाहेर न पडता या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. ते वारंवार सुचना देवुनही कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडत आहेत. त्यांनी सुचनांचे पालन न केल्यास पालिका प्रशासनाच्या वतीने होम क्वारंटाईन ची कारवाई करावी अशा सुचनाही देण्यात आल्या.
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले यापुढे संचारबंदीसाठी विचारविनिमय करुन आवश्यकतेनुसार आणखी उपाय योजना प्रशासनामार्फत केल्या जातील. सर्व नगरसदस्यांनी व्हिडीओद्वारे नागरिकांना खबरदारी घेण्यासाठी सुचना कराव्यात. ज्या भागामध्ये जास्त पॉझीटिव्ह रुग्ण आढळतील अशा भागांची प्राधान्याने दखल घेतली जाईल. औषध फवारणी केली जाईल. दुकानांना चालू करण्याची परवानगी देताना योग्य ती खबरदारी घेतली जाईल. प्रशासन आपल्या सोबत आहेच आपणही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.