सुपारी घेऊन ते भाषण करतात; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई – गल्लीतील लोक कलाकार आहेत. त्यांना आता कोणी मतदान करत नाही. त्यामुळे त्यांना लिहून दिलेल्या स्क्रिप्टवर ते अभिनय करतात. कालचे भाषण सुद्धा तसेच होते. बारामतीच्या पोपटांची संख्या कमी झाल्याने हे सुपारीबाज भाषण ठोकतात, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
मुंबईत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीत महिला मेळावा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, राज ठाकरे जे बोलतात त्याची स्क्रिप्ट बारामतीतून लिहून येते. सध्या बारामतीतील पोपटांची संख्या कमी झाली आहे. त्यांना आता हा पोपट मिळाला आहे. त्यांना (शरद पवारांना) जे बोलायला जमत नाही ते त्या पोपटाकडून बोलून घेतात. पण यांचा (राज ठाकरे) आता एकही आमदार, खासदार, नगरसेवक नाही. ते सुपारी घेऊन भाषणे करत आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे जास्त लक्ष देऊ नका व विचलित होऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुर्यासारखे तळपत आहेत. त्यांच्यावर थुंकाल तर तुमच्याच अंगावर पडेल, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल चढविला.
राज ठाकरे यांनी शनिवारी (९ मार्च) मनसेच्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पुलवामासारखा आणखी एखादा हल्ला घडवून आणतील असा गंभीर आरोप केला होता. दरम्यान, राज ठाकरेंनी मोदींवर केलेला प्रहार भाजपला चांगलाच झोंबल्याचे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसत आहे.