सारखं राज्यपालांना भेटणं त्यांना त्रास देणं आणि व्यवस्थेचे मनोबल खच्चीकरण करणे योग्य नाही : जयंत पाटील
पत्रकार परिषदेत विरोधकांचा घेतला समाचार ;कोरोना युध्दात मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी रहा!
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी
विरोधी पक्षांना जर काही कमी वाटलं तर आम्हाला सांगा आम्ही ते पूर्ण करू मात्र सारखं राज्यपालांना भेटणं त्यांना त्रास देणं हे योग्य नाही. व्यवस्थेचे मनोबल खच्चीकरण करणे योग्य नाही.
त्यामुळे यापुढे फडणवीस राज्यपालांना न भेटता मुख्यमंत्र्यांना भेटतील अशी अपेक्षा आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र बचाव हे आंदोलन जे करत आहेत त्यांनी सरकारसोबत यावं. देशावर संकट आल्यानंतर राज्य देशाच्या मागे उभं राहिलं तसं आता सर्वांनी राज्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मात्र काही लोक राजकारण करत आहेत. त्यांनी यापासून दूर राहावे. सर्वानी मिळून कोरोना विरोधात काम करावे असेही जयंत पाटील यांनी सूचवले आहे.
शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा नेहमीच करत आहेत मात्र जे भेटत नाहीत त्यांना ते पत्र पाठवतात त्यामुळे पवारसाहेब यांनी काय करावं हे आमच्या मित्रांनी सांगू नये असा सूचनावजा सल्ला जयंत पाटील यांनी विरोधी पक्षाला दिला आहे.
मुंबईत पुढच्या ९० दिवसांसाठी सर्व खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. त्यात पेशंटना पाठवण्याबाबत सेन्टरलाईज व्यवस्था महापालिका करणार आहे तर उरलेले २० टक्के बेड हॉस्पिटलकडे असणार आहेत.
डायलेसीस रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यासाठी डायलेसीस बेड फूल केल्या आहेत. त्यांना कमी खर्चात ही सोय उपलब्ध होईल. गेले तीन चार दिवस मुंबईतील रुग्णांसाठी महापालिकेने एक डॅश बोर्ड तयार केला आहे. त्याच्या ट्रायल झाल्या आहेत तर काही लवकर सुरू होणार आहेत. एकूण किती बेड त्यापैकी ICU बेड किती आहेत. हे १९१६ या नंबरला फोन केल्यावर कंट्रोल रूममधून माहिती मिळेल. तिथे दहा डॉक्टर आहेत. पेशंटचा फोन आला की तो कुठे जाणार किंवा कुठल्या बेडबाबत हे सगळं सांगण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे १० – १५ मिनिटामध्ये रुग्णालयात व्यवस्था होणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
आतापर्यंत ३२० रेल्वेने
४ लाख २६ हजार लोक बाहेर गेले आहेत. यामध्ये १८७ रेल्वे उत्तरप्रदेशमध्ये गेल्या. या आठवड्यात २०० ट्रेनचे नियोजन असून ३ लाख लोक बाहेर जातील. त्यामध्ये आज ६५ ट्रेन जातील. एका रेल्वेला ९-१० लाख खर्च येतो. आतापर्यंत ७५ कोटी मुख्यमंत्री सहायता निधी मधून दिले आहेत.
केंद्रसरकारशी वाद घालायचा नाही परंतु नागपूर ते लखनौ खर्च ४७३ रुपये तिकिटांचा आहे. नागपूर ते लखनौ प्रत्यक्ष तिकीट काढले तर ते तिकीट ५०५ रुपये आहे. ऑनलाइन ४७३ रुपये तिकीट आहे मात्र लोकांनी ५०५ रुपये खर्च करून प्रवास केला. नागपूर ते उधमपूर ६८५ रुपये खर्च तर ऑनलाइन
नागपूर ते गोरखपूर ७१५ रूपये प्रत्यक्षात खर्च केला. केंद्राचा दावा आम्ही ८५ टक्के सबसिडी देतो. या आकडेवारीनुसार सध्या तिकीट दर जास्त आहे. केंद्राच्या दाव्यात आणि तिकीट दरात फरक आहे त्यामुळे आमच्या मित्रांनी आपल्या वरीष्ठ पातळीवर बोलावे आणि श्रेय हवं असेल तर ती व्यवस्था चालू आहे का हे पहावे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
रस्त्यावर चालत जाणाऱ्या परराज्यातील मजुरांना १३ हजार ६५५ बसेस पाठवल्या. खासगी गाड्यांना परवानगी देण्यात आली त्यामध्ये २ लाख वाहनातून ८ लाख लोक बाहेर गेले आहेत.
पश्चिम रेल्वेकडे आम्ही जादा रेल्वे गाड्या मागत आहोत. पश्चिम रेल्वे आज ५५ गाड्या सोडणार आहे. तर ३७ गाड्या गुजरातमधून सुटणार आहेत. महाराष्ट्राला फक्त १८ गाड्या दिल्या आहेत. म्हणजे
गरज असताना आपल्याला कमी ट्रेन मिळाल्या आहेत. मात्र
काही लोक चित्र तयार करत आहेत महाराष्ट्र काही करत नाही म्हणून ही आकडेवारी दिल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
केंद्राने २० लाख कोटीचे पॅकेज दिले. २० लाख कोटीपैकी २ लाख कोटी इतकी रक्कम बजेट मधून जात – येत आहे. जीडीपीच्या एक टक्के रक्कम येत आहे. आमच्याकडून पॅकेज मागितलं म्हणून खुलासा करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
आज पैशाची भ्रांत आहे
मुंबई, पुणे शहर ठप्प आहेत. केंद्र सरकारकडून ४०-५० कोटी राज्याला देतात त्यातले हक्काचे पैसे आले नाही. केंद्राने वेळेवर पैसे दिले पाहिजे. जीएसटीचे ५१०० कोटी केंद्राने अजून दिले नाही असेही यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत काय प्लॅन आहेत हे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्विटमधून कळवले आहे. त्यामुळे आम्ही काम करत आहोत
त्यामुळे कोविडबाबत मुख्यमंत्र्यांच्या मागे उभे रहावे हे भान सगळ्यांनी पाळावे असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले आहे.