सायकल घेऊन दिली नाही म्हणून 12 वर्षीय मुलाची आत्महत्या
पिंपरी – वडिलांनी सायकल घेऊन दिली नाही म्हणून बारा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना देहूरोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास समोर आली. आई-वडील घरी नसताना त्याने पंख्याला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. इशांत बलवीर शर्मा (वय-१२ रा.श्रीधर सोसायटी,अप्पूघर जवळ,निगडी) असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. याचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत इशांत हा हट्टी होता, घरात नेहमी त्याचे लाड व्हायचे. त्याच्या सर्व गोष्टींची पूर्तता होत होती. परंतु एका गोष्टीमुळे घात झाला आणि त्याने आपले जीवन संपवले. इशांत गेल्या काही दिवसांपासून वडील बलवीर शर्मा यांच्याकडे नवीन सायकलची मागणी करत होता. जुनी सायकल वापर, नंतर नवीन सायकल घेऊ असा सल्ला वडिलांनी मयत इशांतला दिला. हाच सल्ला त्याच्या जिव्हारी लागला आणि मला नवीन सायकल हवीच आहे असा हट्ट इशांतने धरला.
शनिवारी वडील कामावरवर गेले होते, तर इशांतची आई भाजी आणण्यासाठी बाहेर गेली. याचाच फायदा घेत त्याने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती चुलते पवन शर्मा यांना मिळाली, त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तातडीने बेशुद्ध अवस्थेत त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु तोपर्यंत इशांतने हे जग सोडलं होतं. डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वी मयत घोषित केले. या घटनेमुळे आई वडिलांच्या पाया खालची जमीन सरकली आहे. शर्मा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा तपास देहूरोड पोलीस करत आहेत.