साप सोडण्याचा कट रचणाऱ्यांचे संभाषण आमच्या हाती : चंद्रकांत पाटील
मुंबई – पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांमध्ये घबराट निर्माण करण्यासाठी वारीमध्ये साप सोडण्याचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक दावा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. बड्या नेत्यांनी वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा कट रचला होता. बड्या नेत्यांचे फोनवरील संभाषण आमच्या हाती लागले आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी ही खळबळजनक माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चात सामील असणाऱ्या सर्वांनाच सापसोडे म्हटलेले नाही. गुप्तचर विभागाकडून जी माहिती मिळाली त्याआधारे मुख्यमंत्र्यांनी ते विधान केले आहे. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, साप सोडण्याच्या धमकीमुळे वारकऱ्यांमध्ये घबराट पसरू नये, यासाठीच मुख्यमंत्र्यांनी आषाढीची शासकीय महापूजा न करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही मुख्यमंत्र्याला आषाढी महापूजा हा मोठा सन्मान असतो, पण त्यावरही त्यांनी पाणी सोडले, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली.
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. मराठा आरक्षण हा आमच्यासाठी राजकीय अजेंडयाचा विषय नसून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणावर आधीच्या सरकारने फक्त अध्यादेश काढला होता. पण तो अध्यादेश फेटाळला गेला म्हणून आम्ही कायदा केला. पण कायदाही कोर्टात टिकला नाही. म्हणून आम्ही मागासवर्ग आयोगाची स्थापना केली, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबींवर सरकारकडून अभ्यास सुरु आहे. आमच्या कार्यकाळात नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असा दावा त्यांनी केला.