सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला बाळासाहेबांचे नाव द्या, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची मागणी
कराड : सातारा आणि सांगली जिल्ह्यात विस्तारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी गृह राज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी केली.
सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रकल्पाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. वनमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी शंभूराज देसाई यांनी प्रकल्प आणि पर्यटन विकासाच्या संदर्भात काही मुद्दे मांडले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी यावेळी शंभूराज देसाई यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करुन लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येईल, आणि नामविस्तारावर शिक्कामोर्तब होईल असा, विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील काही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचे ठरल्याची माहिती देसाई यांनी दिली. घाटमाथ्यावर कोकण दर्शन विकसित करणे, वॉकिंग ट्रॅक यासाठी सहा कोटी रुपयांची तरतूद केल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीला संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि सचिव यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही उपस्थिती लावली होती.