सविस्तर आकडे द्या!
पृथ्वीराज चव्हाणांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष खर्च किती? आणि कर्ज किती? याचे आकडे सादर करावेत, असे आव्हान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सुमारे २ लाख ७० हजार कोटी रुपये मिळाले, असा दावा फडणवीस यांनी केला. यामध्ये त्यांनी एक गोष्ट भासविण्याचा प्रयत्न केला आहे, की महाराष्ट्राच्या वाटय़ाचे सगळेच पैसे थेट राज्य सरकारच्या तिजोरीत येणार आहेत. विश्लेषणानुसार केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये केवळ २ लाख कोटी रुपयेच रोख रक्कम आहे. आणि बाकीचे पॅकेज हे कर्ज रूपाने दिले जाणार आहेत. हे पाहता महाराष्ट्राच्या वाटय़ाला त्या २ लाख कोटी पैकी जास्तीत जास्त २० हजार कोटी रुपये रोख मिळू शकतात, असा दावा चव्हाण यांनी केला आहे.
रिझव्र्ह बँकेकडून महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या म्हणजेच राज्याच्या (जीएसडीपीच्या) ५ टक्के रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले आहे. ही रक्कम जवळपास १ लाख ६० हजार कोटी आहे असे स्पष्ट केले आहे. पण, ही दिशाभूल असून, राज्यांना आधीपासून जीएसडीपीच्या ३ टक्के कर्ज घेण्याची परवानगी होतीच, ती आता २ टक्के वाढवून ५ टक्केपर्यंत वाढवली हे खरे आहे, परंतु त्या वाढीव २ टक्के पैकी फक्त ०.५ टक्के रक्कम म्हणजेच जास्तीत जास्त १५ ते १६ हजार कोटी रुपयेच तातडीने मिळू शकतील. उर्वरित १.५ टक्के रक्कम म्हणजे उचल (सुमारे ४५ हजार कोटी) करण्याआधी अनेक अटी आणि निकष लावण्यात आलेले आहेत असा आरोप चव्हाण यांनी केला.