सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : हुंड्यासाठी छळ करणा-यांना होणार तातडीने अटक
नवी दिल्ली (महा ई न्यूज) – हुंड्यासाठी छळ प्रकरणात आता आरोपींना तातडीने अटक होणार आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या आधीच्या निर्णयात बदल करत हुंड्यासाठी छळ प्रकरणातील पीडितेच्या सुरक्षतेच्या कारणास्तव हा निर्णय दिला आहे.
भारतीय दंड विधान 498 (अ) या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे यावरील सुनावणी करताना गेल्यावर्षी सुप्रीम कोर्टाने आरोपींना सरळ कोठडीत डांबू नका. या प्रकरणाच्या तक्रारींची शहानिशा करूनच आरोपींवर गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले होते. तसेच, याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कुटुंब कल्याण समिती स्थापन करण्यास सांगितले होते. मात्र, शुक्रवारी मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि न्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने आधीच्या निर्णयामध्ये बदल करत कुटुंब कल्याण समितीची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, याप्रकरणातील पीडितेच्या सुरक्षतेच्या कारणास्तव आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.