सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा नाही का? – उद्योगपती राहूल बजाज
मुंबई – देशात सध्या भीतीचं वातावरण असून, सरकारवर टीका करायलाही लोक घाबरतात. सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा नाही का, असा सवाल प्रसिध्द उद्योगपती राहूल बजाज यांनी उपस्थितीत करत देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांच्यासमोर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील होते.
मुंबईत ‘इकॉनॉमिक टाइम्स अॅवॉर्ड’ सोहळ्यात उद्योगपती बजाज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पीयूष गोयल आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
देशातील सध्याच्या परिस्थितीवर बजाज यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘देशात सध्या भीतीचं वातावरण आहे. सरकारवर टीका करायलाही लोक घाबरतात, असं ते म्हणाले. उद्योग जगतातील आमचे कुणीही मित्र उघडपणे बोलत नाहीत. पण मी खुलेपणाने बोलतो. यूपीए २ सरकारच्या काळात आम्ही कुणावरही टीका करायचो. तुमचं सरकार खूप चांगलं काम करत आहे. पण तरीही आम्ही तुमच्यावर उघडपणे टीका करू शकत नाही. कारण तुम्ही या टीकेचे स्वागत कराल असा विश्वास नाही,’ असं ते म्हणाले.